Friday 30 January 2009

बाजीराव पेशवे - सारांश.

बाळाजीच्या मृत्युनंतर "पेशवेपदासाठी" दरबारी लोकांत अहमिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत देऊ नये असे इतर दरबारी म्हणु लागले. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणा पासुन ते ताराराणी पर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहु महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहु महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली. बाजीराव शिपाईगडी होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या आयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१)उदय्पुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा "सक्सेस रेट" "१००%" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढुन जिंकु शकतो हे मराठी सैन्याला जाणवुन द्यायला कारणीभुत झाली. बर्नाड मोन्ट्गोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटीश ’फिल्ड्मार्शल’ ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता.

पहील्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्व पुण्याला मिळवुन दिले. शनिवारवाड्या बद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठीकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट कील्लाच बांधुन घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालुन येणारे ’शिकारीकुत्रे’ खरच स्वराज्याला घाबरु लागले.

दिल्लीचा वजिर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालुन आला। तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली। बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकालेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपुर उतरले होते। त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले। मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवुन त्याने हेरां मार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजांतमोक्षाचा" हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालुन गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजिरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी "मस्तानि" बाजिरावास दिली, जेणेकरुन बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतिल.


या शिवाय बाजीरावास "काशीबाई" ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासुन बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडुन समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधुन घेतला.चिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखिल कोकण घाट आणि कीनार्‍यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाउ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगिजांना त्यांची जागा दाखवुन दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगिजांकडुन ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकुन घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला किर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेउन गेली. त्याची जाणिव ठेवुन चिमाजीने वसई जवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.

बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकुन मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडुन, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हा ६ फुट होता, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्याचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. थोरले बाजीराव हे जगातील एकमेव अपराजित सेनापती होते.

1 comment:

आदित्य said...

aaplyaala ekch soochana karavishi vaTate. kalya parshvabhoomivar pandhari akshare vachatana dolyana khoop tras hoto. aani aaple sarvach lekh vachanyajoge ahet. tevha krupaya ya babat thode vegaLe prayog karun pahavet.

शिवरायांचा पाळणा:-

गुणी बाळ असा जागसि का रे वांया नीज रे नीज शिवराया अपरात्री प्रहर लोटला बाई तरि डोळा लागत नाही

हा चालतसे चाळा एकच असला तिळ उसंत नाही जिवाला निजयावयाचा हरला सर्व उपाय जागाच तरी शिवराय

चालेल जागता चटकाहा
असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया नीज रे नीज शिवराया १ ही शांत निजे बारा मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ त्या निजल्या ना तशाच घाटाखाली कोकणच्या चवदा ताली ये भिववाया बागुल तो बघ बाळा किति बाई काळा काळा

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया नीज रे नीज शिवराया २

प्रभो शिवाजीराजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा - स्वातंत्र्यवीर सावरकर